वॉटरशेड यात्रेचा सुकळी येथे शुभारंभ
वर्धा : पाण्याचं महत्व काय, पाण्याचा निष्काळजीपने जर वापर केला तर दुष्काळ सहन करावा लागतो. म्हणूनपाणी सनवर्धनाच काम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, यासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकसहभाग वाढल्याशिवाय पाण्याच्या चळवळीला यश येत नाही. चळवळ यशस्वी करायला सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद लाभला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले. सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन येथे वॉटरशेड यात्रेला हिरवी झेंडी देऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, शेखर शेंडे, नदी जाणून घेताना प्रकल्पाचे सुनील रहाणे, माजी जी प सदस्य सुमित्रा मलघम, सुकळी स्टेशन च्या सरपंच निलिमा जाधव, उपसरपंच प्रमोद तडस, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, गट विकास अधिकारी पाणबुडे तालुका कृषी अधिकारी राऊत, जलसंधारण अधिकारी अक्षय बेंदरे उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार अमर काळे म्हणाले की, राज्याचे ग्राम विकास मंत्री असताना आर आर पाटील यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता ही योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून एक स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहिली होती. जो प्रतिसाद संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला या राज्यातील लोकांनी दिला होता. तोच प्रतिसाद लोकांनी वॉटरशेड योजनेला द्यावा. पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होणार असे भाकीत अनेक विचारवंतांनी केले आहे, त्यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. पाण्याची पातळी भूगर्भात खाली गेली आहे. शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विहिरी देणे शक्य होत नाही आहे, याचे कारण असे आहे की अनेक भागात चारशे फूट खोदूनही पाणी लागत नाही अशा भागात डार्क झोन देखील घोषित केला आहे. केंद्र सरकारने जलसंधारण विषयात आपला वाटा वाढवावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार अमर काळे यांनी दिले. लोकांनी विदर्भातील बऱ्याच भागात दुष्काळ अनुभवला आहे त्यामुळे वाटरशेडच्या माध्यमातून गावं पाण्याने समृद्ध करण्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी वॉटर शेड यात्रेच्या निमित्ताने जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले आहे. राळेगावसिद्धीचे उदाहरण देत त्यांनी नदीच्या उगमापासून त्याच्या अखेर पर्यत नदी संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने पाणलोट यात्रा कार्यक्रमाचे महत्व विषद केले. पाणलोट क्षेत्रात काम करण्यासाठी क्लस्टरचे महत्व जास्त आहे, गावाचं पाणी अडवून जर साठवलं तर टंचाई भासणार नाही. माथा ते पायथा यानुसार नियोजनाची गरज आहे, पाणी साठवल्याने शिवारात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहील, वॉटर शेडची कामे झाली तर गावातील दुष्काळ देखील दूर होईल. यासाठी माथा ते पायथा कार्यक्रमाला भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच सरकारकडून जलसंधारणासाठी वेगळा निधी अत्यावश्यक असल्याचे माधव कोटस्थाने यांनी सांगीतले.
जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील काही गावात ही वॉटर शेड यात्रा पोहचणार आहे. गावागावात पाणी नियोजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सुकळी स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पाणी वाचविण्यासाठी आवाहन करीत पथनाट्य मधून जनजागरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य देखील सादर केले. कृषी विभाग व जल संधारण विभागाकडून पाणलोट क्षेत्राचे मॉडेल ग्राम पंचायतीच्या आवारात करण्यात आले आहे. जनजागृती साठी तयार केलेल्या या मॉडेलला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी भेट दिली. जलसंधारण या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देत त्यांना प्रोत्साहित करण्यात आले तसेच जलयोद्धा म्हणून पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी तंत्र सहाय्यक विशाल वाघ यांनी केले तर आभार कृषी मंडळ अधिकारी विशाल विरे यांनी मानले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940